आई तू म्हणतेस......!
तू म्हणतेस रामायणातला
न्याय प्रिय होता राम,
मग चारित्र्यावर संशय सितेच्या
त्याने का घेतला सांग.
तू म्हणतेस ओढणी
सदा छाती भोवती ठेव,
डावावर मांडतांना द्रौपदी
का चुकलेत देव.
तू म्हणतेस लिलावती सारखं
व्रत सत्यनारायणाचं कर,
टायटानिकचं ही जहाज
तसंच येईल का गं वर.
तू म्हणतेस शामची आई
होती खूप महान,
मग शुद्रास मदत करणाऱ्या शामला
ती का घालते स्नान.
तू म्हणालीस अशुभ झालं
आता होईल जग बुडवी,
मग दाभोळकरांना मांजर
का नाही गेली आडवी.
तू म्हणालीस सावित्री फुले
मुलींना शिक्षण देऊन गेली,
मग सत्यवानाची सावित्री
मध्येच कुठून आली.
तू म्हणतेच नैसर्गिक आपत्ती
देवाचीच असते लीला,
मग तो ही या जगाचा
हिटलर नाही का झाला.
तू म्हणतेस मुलगी तू
घराबाहेर नको जाऊ,
मग तूच सांग कल्पनेसारखी
भरारी कशी घेऊ.
आई देव पावावा म्हणून
कुमारीका जेवू घालता इथं,
त्याच देशात गर्भात आई
मुली सुद्धा मारता इथं.
कधी गणपती पाण्यात टाकतेस
कधी उपास-तापास करतेय,
आई सांग ना गं तू
अशी का म्हणून वागतेस.
आई मी काय म्हणतेय
तू सारासार विचार जरा कर,
गुंढाळून ठेव पोथ्या पुराण
अन शिक्षणानं ओटी माझी भर.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें